आयुष्यभराच्या सोबतीसाठी जोडीदाराची निवड करणं तसं जिकिरीचं काम असतं. या निवडीबाबत कोणती नियमावली नाही. तरीही जोडीदाराची निवड करताना काही काळजी अवश्य बाळगली पाहिजे. त्यासाठीच हा संवाद :
खरं तर प्रत्येक युवक- युवतीच्या मनात त्याचा जोडीदार म्हणजे स्वप्नातला राजकुमार किंवा राजकुमारीच असते. कदाचित यामुळेच अपेक्षांचं ओझं या काळात मनावर असणं स्वाभाविक असतं; पण केवळ नुसत्या मोठमोठ्या अपेक्षा बाळगण्यात अर्थ नसतो. विवाहापूर्वी आपल्या विवाहाकडून आणि जोडीदाराकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. अनेकदा विवाहेच्छूंनी याचा म्हणावा तितक्या गांभीर्याने विचार केलेला नसतो.
विवाह हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा निर्णय आहे, त्यामुळे आपला जीवनपटच बदलू शकतो, हे लक्षात घ्यावं. आपल्याला नेमका कसा जोडीदार हवा, हे ठरवण्याआधी आपला स्वभाव, आवडीनिवडी, गुणदोष यांचा बारकाईने विचार केला जावा. स्वतःबद्दल योग्य भान असेल तर आपल्या गरजाही स्पष्टपणे समजून येतात; पण अनेकदा तरुण मुला- मुलींना स्वतःचीच नीट ओळख पटलेली नसते. आपलं करिअर, जीवनविषयक दृष्टिकोन, ध्येय यांचा विचार केलेला नसतो. मग अशा संभ्रमित अवस्थेत तुम्ही योग्य जोडीदार निवडाल, अशी अपेक्षा तरी कशी करायची? यासाठी विवाह करण्यापूर्वीच स्वतःमध्ये डोकावून स्वतःचीच ओळख करून घ्यायचा प्रयत्न करावा, हे आत्मभान फार महत्त्वाचे आहे.
|